new-img

कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची अपडेट! नाशिकमध्ये उभारणार कांदा भुकटी प्रकल्प

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबत नाशिक जिल्ह्यातील विधान परिषदेचे माजी सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषी मंत्री मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. काही वेळेस शेतकरी कांदा फेकून देतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीकडून डिहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी जाधव यांनी शासनाकडे केली होती.